अर्थात

अर्थशास्त्रातील कल्पना आणि व्यक्तींचा आढावा

Goodreads

बरेच दिवस मराठीत काहीतरी आधुनिक लेखन वाचावे असे वाटत होते. मार्चमध्ये ट्रम्पने टॅरिफचा धुरळा उडवायला सुरु केला होता. तेव्हा मला जरा आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल उत्सुकता निर्माण झाली. मग बरीच वर्षे कपाटात धूळ खात पडलेले अच्युत गोडबोलेंचे “अर्थात” पुस्तक बाहेर काढले. त्यांचे विज्ञान आणि वैज्ञानिकांबद्दलचे “किमयागार” अनेक वर्षांपूर्वी वाचले होते म्हणून मी हे पुस्तक सहजच विकत घेतले होते. “किमयागार” प्रमाणेच या पुस्तकात अर्थशास्त्र, त्यातले महत्त्वाचे सिद्धांत आणि कल्पना, आणि त्यात काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा ऐतिहासिक आढावा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. पुरातन कालातील ग्रीक, रोमन, भारतीय अर्थशास्त्रातील कल्पना, पैशाचा उगम आणि वापर ते मध्ययुगीन Renaissance आणि औद्योगिक क्रांती नंतर आलेले ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, जॉन मेनार्ड केन्स ह्यांच्या कल्पना, ते सध्याचे अमर्त्य सेन, स्टिग्लिट्झ, क्रुग्मन, पिकेटी यांचे संशोधन इथेपर्यंत पुस्तकाचा प्रवास आहे.

मला स्वतःला कॉलेजमधला प्राथमिक कोर्स घेतल्यानंतर नंतर फारसा अर्थशास्त्राचा विचार करायची संधी नव्हती मिळाली. मला बँकांच्या CRR, व्याज दर इत्यादी वापरून पैसापुरवठा नियंत्रित करायच्या युक्त्या, सरकारचे बाँड मार्केट, त्यांचा व्याजदराशी संबंध हे शिकायला मजा आली. महागाई आणि बेरोजगारीचा चक्राकार संबंध साधारण माहीत होता पण त्यातले सूक्ष्मभेद (nuances) समजून घेण्यात बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. रुपया वि. डॉलरचा दर रोज बातम्यांमध्ये बघायचो पण तो नक्की बदलतो का आणि कसा हे कधी समजून घ्यावेसे वाटले नाही. पण या पुस्तकात परकीय चलनदर आणि त्याचा आयात-निर्यातीशी संबंध छान समजावून सांगितला आहे. बातम्यांमध्ये अनेकदा वाचूनसुद्धा फारसे या गोष्टीबद्दल कुतूहल कधी वाटले नाही, पण ते आता जागृत केल्याबद्दल ट्रम्पसाहेबांचे आणि या कुतूहलाचे समाधान केल्याबद्दल लेखकांचे आभार! खरे तर आता बायको चालवते त्या सॉफ्टवेयर/AI कंपनीची केलेली निर्यात मला घर-बसल्याच बघायला मिळते. त्यामुळे रुपयाचा दर घसरला की तिला मी अजून काम करायला सांगतो. हे सगळे वाचून मात्र आपले राजकारणी ज्या आत्मविश्वासाने गरिबी, महागाई, बेरोजगारी हटवायची आश्वासने देतात ते बघून त्यांचे कौतुकच वाटते.

लेखक अच्युत गोडबोलेसुद्धा IIT Bombay चे माजी विद्यार्थी आहेत. ते कॅम्पसमध्ये असताना इतर विद्यार्थ्यांबरोबर केलेला अर्थशास्त्राच्या अभ्यास, अभ्यास करताना केलेले वादविवाद, प्रत्यक्ष गरीब कामगार आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन बघितलेले हाल आणि त्यांच्याबरोबर केलेले काम याचे पण वर्णन केले आहे. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या विचारांमध्ये होणारे बदल त्यांनी लिहिलेत. त्यांच्या या कॅम्पस अनुभवांबद्दल वाचताना मला त्यांचा जरा हेवाच वाटला. मी तिथे असताना दुर्दैवाने असे काहीच केले नाही आणि फालतू विषयांवर चर्चा करण्यात वेळ घालवला याचे जरा वाईट वाटले.

पुस्तकाच्या शेवटी भारतीय अर्थ व्यवस्थेबद्दल लेखकाचे (अभ्यासू) आणि माझे (अडाणी) मत बऱ्यांपैकी सारखे आहे हे बघून बरे वाटले. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती संतुलितपणे होत नसून तिच्यात योगदान करणारा आणि तिची फळे चाखणारा वर्ग खूपच छोटा आहे. जीडीपीचे आकडे वाढवण्याच्या नादात आपली शहरे, पर्यावरण, आणि आरोग्य निश्चितच खराब होत आहेत. पण अशी प्रगती काहीतरी कारणांमुळेच होत आहे आणि तिला थांबवणं माझ्या मते अशक्यप्राय आहे. लेखक या प्रगती बद्दल बरेच निराशावादी वाटले पण मी मात्र बहुतांशी आशावादी आहे. अशा विचित्र, असंतुलित वाढीची १-२ पिढ्यांना फळे भोगावी लागतील पण हळू हळू ती सगळ्या स्तरांवर पसरेल अशी मला आशा आहे. भारत अजूनही वयाने बरच लहान राष्ट्र आहे आणि बरीचशी विकसित राष्ट्रसुद्धा या टप्प्यावर कधी ना कधी होतीच.

असो. बाकी पुस्तक छान आहे. माझ्या आवृत्तीत बरेच typo आणि शुद्धलेखनाच्या आणि काही आलेखांच्या चुका आहेत. पण अर्थशास्त्राची पुन्हा ओळख करून घेण्यासाठी, त्याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आणि शेवटी दिलेल्या संदर्भ-ग्रंथांच्या यादीसाठी हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

Amod Jog
Amod Jog

My research interests include medical image analysis, computer vision, and machine learning/artificial intelligence.

Related